मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो, कि ज्या
वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली हि एक मानवंदना असते.
(.. पु. ल. )
 
संकुचित प्रांतीयतेचे धोके !

... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण? माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो! इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका! कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील? माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते. लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय? कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं! माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.

या जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य! स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात! सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की! हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा! तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे!

... अपूर्ण ('रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका')



पुलकित
First time uploaded on 15/04/2001 फाँट मदत आभार Please read:Disclaimer Last time updated on 12/06/2009